Friday 10 October 2014

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम

जन्म ऑक्टोबर १५, १९३१, तमिळनाडू, भारत,)
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे भारताचे अकरावे राष्ट्रपती (कार्यकाळ २००२ ते २००७) होते. आपल्या आगळ्या कार्यपद्धतिमुळे ते 'लोकांचे राष्ट्रपति' म्हणून लोकप्रिय झाले.
त्यांचे पूर्ण नाव डॉ अबुल फकीर जैनुलाबदिन अब्दुल कलाम असे आहे. त्यांचे वडील रामेश्वरमला येणार्‍या यात्रेकरुंना होडीतून धनुष्कोडीला नेण्या आनण्याचा व्यवसाय करीत. या कुटूबांची रामेश्वर खुप श्रध्दा आहे. डॉ. कलाम यांनी आपले शालेय शिक्षण रामनाथपुरमला पूर्ण केले. शाळेत शिक्षकांकडून जातिभेदाचे काही कटू अनुभव त्यांना आले. शाळेत असतनाच गणिताची त्यांना विशेष आवड होती. नंतर ते तिरुचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेजमध्ये दाखल झाले. तेथे बी.एस्सी. झाल्यानंतर त्यांनी 'मद्रास इन्स्टिटयुट ऑफ टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला. प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. बहिणीने स्वत:चे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिलेे आणि तेव्हापासूनच डॉ. कलाम यांना पैशाचे महत्व पटले. या संस्थेतून एहोनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर १९५८ ते ६३ या काळात संरक्षण संशोधन व विकास संस्थेशी त्यांचे नाते जूळले. लहान वयातच वडिलांचे छत्र गमावल्याने डॉ. कलाम गावात वर्तमानपत्रे विकून, तसेच अन्य लहान मोठी कामे करुन पैसे कमवीत व घरी मदत करीत. त्यांचे बालपण खूप कष्टात गेले.
पुढे प्रख्यात शास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले, अमेरिकेतील 'नासा' या प्रसिध्द संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीच्या प्रशिक्षणासाठी जाण्याची संधी त्यांना मिळाली. मुळातच चाणाक्ष, अभ्यासू व परिश्रमाची सवय असणार्‍या डॉ. कलाम यांनी अल्पावधीतच या विषयातील तंत्रज्ञान आत्मसात केले. त्यानंतर प्रशिक्षणासाठी ते पुन्हा कधीही परदेशी गेले नाहीत.
स्वदेशी बनावटीची क्षेपणास्त्रे तयार करण्याची त्यांची जिद्द तेव्हापासूनचीच आहे. १९६३ नंतर ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्त्रो) मध्ये दाखल झाले. सॅटेलाईट लॉंच व्हेईकल ३ या प्रकल्पाचे ते प्रमुख झाले. साराभाईनी भारतात विज्ञान तंत्रज्ञानाची आघाडी डॉ. कलाम यांनी सांभाळावी, असे वक्तव्य केले होते, ते पुढे त्यांनी सार्थ करुन दाखविले. नंतर साराभाईंचेच नाव दिलेल्या 'विक्रम साराभाई अवकाश केंद्रा'चे ते प्रमुख झाले. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारताने क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला त्या वेळी डॉ. कलाम पुन्हा डीआरडीओमध्ये आले.
वैयक्तिक कामपेक्षा सांघिक कामगिरीवर त्यांचा भर असतो व सहकार्‍यांमधील उत्तम गुणांचा देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी उपयोग करुन घेण्याची कला त्यांच्यामध्ये आहे. क्षेपणास्त्र विकासकार्यामधील 'अग्नी' क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉ. कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले. पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करतांना देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी अनेक प्रभावी धोरणांची आखणी केली. विज्ञानाचापरमभोक्ता असणारे डॉ. कलाम मनाने खुप संवेदनशील, साधे व सरळ आहेत. त्यांना रुदवीणा वाजण्याचा, मुलांशी गप्पा मारण्याचा छंद आहे. भारत सरकारने 'पद्मभुषण', 'पद्यविभुषण' व १९९८ मध्ये 'भारतरत्न' हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला. डॉ. कलाम हे अविवाहित आहेत व पूर्ण शाकाहारी आहेत. येत्या वीस वर्षात विकसित भारताचे स्वप्न ते पाहतात. बालपण अथक परिश्रमांत व्यतित करुन विद्येची अखंड साधना करीत खडतर आयुष्य जगून जगातील सर्वात मोठया लोकशाही राष्ट्राच्या राष्ट्रपतिपदी निवड झालेले डॉ. कलाम हे युवकांना सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व आहे.

No comments:

Post a Comment